Weather Update : पुण्यापासून जळगावपर्यंत... महाराष्ट्र गारठला; महाबळेश्वरकडे वळले पर्यटकांचे पाय

Weather Update : मागील काही दिवसांपासून राज्यातील तापमानात बरेच बदल दिसून आले. यामधील एक सुखावह बदल म्हणजे राज्यात पडलेली थंडी.   

सायली पाटील | Updated: Nov 3, 2023, 08:02 AM IST
Weather Update : पुण्यापासून जळगावपर्यंत... महाराष्ट्र गारठला; महाबळेश्वरकडे वळले पर्यटकांचे पाय  title=
Maharashtra weather Pune Mahabaleshwar matheran to experiance cold wave

Weather Update : ऑक्टोबर हिटमुळं उन्हाच्या झळा आणखी तीव्र होत असतानाच राज्यातील किमान तापमानाच घट होण्यास सुरुवात झाली. तापमान मोठ्या फरकानं खाली गेलं आणि आता आता तर, पुण्यापासून उत्तर महाराष्ट्रापर्यंत राज्यत थंडीनं चांगलाच पाय रोवल्याचं स्पष्ट होत आहे. हवामान विभागाच्या निरीक्षणानुसार सध्या उत्तर महाराष्ट्रामध्ये तापमान कमी होण्यास सुरुवात झाली आहे, तर राज्याच्या दक्षिण भागात मात्र थंडीची प्रतीक्षा कायम आहे. 

मागील 24 तासांमध्ये रत्नागिरीमध्ये राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली जिथं, हा आकडा 36 अंशांवर असल्याची बाब निदर्शनास आली. लक्ष देण्याजोगी बाब म्हणजे आता किमान तापमानासोबतच कमाल तापमानातही घट होत असल्यामुळं राज्यात थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

पुण्यारा पारा 14 अंशांवर

कोकणासह पुण्यातही तापमान बरंच कमी झाल्याचं पाहायला मिळत असून इथं किमान तापमानात चढ-उतार पाहायला मिळाले. इथं पारा 14 अंशांच्या घरात पोहोचला. तर, कमाल तापमान 32 अंश असल्याचं पाहायला मिळालं. परिणामी मागील दोन दिवसांपासून गारठा काहीसा वाढला होता.

पुढील आठवडाभर किमान तापमानातील चढ-उतार अशाच प्रकारे कायम राहण्याची शक्यता आहे. यातच पहाटेच्या वेळी धुके पडण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पुणे व परिसरात कमी अधिक प्रमाणात थंडी जाणवेल.

हेसुद्धा वाचा : सलग 7 व्या विजयानंतर कर्णधार रोहित शर्मा प्रचंड आनंदी, ‘या’ खेळाडूंना दिलं विजयाचं श्रेय

हवामान विभागाच्या माहितीनुसार नोव्हेंबर महिन्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या अंदाजाप्रमाणं यंदा राज्यातील बहुतांश भागात थंडी कमी राहणार असल्याचा अंदाज आहे. काही भाग मात्र इथं अपवाद ठरेल. पुढील दोन दिवसांमध्ये उत्तर महाराष्ट्रात गारठा वाढण्याचा अंदाज आहे. तर, उर्वरित राज्यातील बहुतांश भागात किमान तापमान 16 अंशांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.

सध्याच्या घडीला राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद जळगाव येथे करण्यात आली असून, इथं पारा 10.9 अंशावर पोहोचला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढत असला तरीही देशाच्या सपाट भूभागावरील देखील नीचांकी तापमान म्हणूनही जळगावातीलच तापमानाची नोंद करण्यात आली आहे.